बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा झाली आहे. परंतु तांत्रिक चुकीने त्यात अपात्र हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम गेल्याचा साक्षात्कार बजाज अलियान्झ कंपनीला झाला असल्याचे समोर. आले आहे. त्यानुसार बजाज कंपनीने ‘ त्या ‘ शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम परत बजाज अलाइस कंपनीच्या खात्यात वळविण्याचे पत्र अग्रणी बँकेला दिले आहे. या अशा एक ना अनेक प्रकारामुळे जिल्ह्यातील पीक विम्याचा घोळ मिटता मिटेना गेल्याची अवस्था झाली आहे.

तक्रार करुनही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे ते दररोज बँकेतून आज मेसेज येईल, उद्या मेसेज येईल अशी वाट पाहत आहेत. त्यात मिळाला त्यांनाही कोणाला कमी तर कोणाला जास्त रक्कम आल्याने नेमके कोणत्या नियमानुसार विमा आला याचा ताळमेळ लागेना. त्यातच तक्रार न केल्याने बहुतांश शेतकरी पीक विम्याला मुकणार आहेत. त्यातच बजाज अलाइस कंपनीने दुसरेच कारण पुढे आणले आहे. तांत्रिक चुकीमुळे १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ चा पीक विमा जमा झाल्याचा दावा केला. तब्बल १२ लाख ३५ हजार रुपये बजाज अलियान्झ कंपनीच्या खात्यावर जमा करण्याची मागणी राज्याचे व्यवस्थापक अजिंक्य खिर्डीकर यांनी अग्रणी बँक बीड येथे पत्र पाठवून केली. या सोबत दावा केल्या प्रमाणे १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या नावांची यादी दिली आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेली पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम परत जाणार असे चिन्ह दिसत आहेत.
