देशात कुठूनही मतदान करता येणार…?
आपल्या गावापासून नोकरी, काम-धंद्यानिमित्त अनेक जण स्वतःचे गाव, शहर सोडून दूर राहतात. निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा या नागरिकांना मतदानासाठी येता येत नाही. अशा लोकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
देशातील नागरिकाला तो कुठेही असला, तरी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ‘रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन’ (RVM) तयार केले आहे. येत्या 16 जानेवारीला या मशीनच्या डेमोसाठी राजकीय पक्षांना बोलावले आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित असेल. शिवाय विविध मुद्द्यांवर आयोगाने 31 जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.
2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशात 67.4 टक्के मतदान झाले होते, म्हणजेच, तब्बल 30 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘आरव्हीएम’ फायदेशीर ठरणार आहे.
